वारी पंढरीची आनंदाचे डोही, आनंद तरंग! आषाढ /कार्तिक महिना लागला, की अवघ्या महाराष्ट्राला वेध लागतात ते वारीचे. पंढरपूरला जाणाऱ्या वारी सोहळ्यामध्ये किती तरी वारकरी अतिशय समरसून सहभागी होतात विठू माउलीच्या भेटीची ओढ लागते, पावलं पडत जातात आणि मनात आनंदचा वर्षाव होत राहतो. उत्साह कमी होत नाही, की त्यातलं भारलेपण कमी होत नाही. भेटी लागी जीवा लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस वाट तुझी॥ पंढरीच्या आषाढी /कार्तिक वारीच्या वाटेवर कोणतीही व्यवस्था नसताना लाखो वारकरी निर्माण होणाऱ्या गैर सोयी सुद्धा सोय मानतात. जागा मिळेल तिथं मुक्काम. एरवी भौतिक सुविधांचे रमणारा माणूस वारीच्या वाटेवर उपलब्ध अवस्थेतसुद्धा सुखाची अनुभूती घेतो, हेच पंढरीच्या वारीचं वैशिष्ट्य आहे. वारी हे या महाराष्ट्राचं वैभव आहे.
महाराष्ट्राची संस्कृती निर्माण करण्यात; तसंच तिचं रक्षण करण्यात वारकरी संप्रदायाचे योगदान अतिशय मोठा आहे. संतवाङ्मयाचं पारायण, भजन यांच्या माध्यमातून वारी ही संस्कृती अधिकच बळकट आणि प्रगल्भं रूप घेते. वारी ही एकात्मतेचं प्रतीक आहे. तिच्यात सामाजिक विषमतेचा लवलेश नाही. वारीत वारक-यांची संख्या वाढत आहे. वाढत्या संख्येनं, त्यातून येणा-या भव्यतेनं संस्कृतीमध्ये नित्यनूतनता जशी येते, तशी तिची पाळेमुळेही आणखी चांगली रुजत आहेत. मानवी जीवनाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी आवश्यक सर्वगुणांची प्राप्तता, त्यांचे संवर्धन आणि त्यांची परिपूर्णता वारीमध्ये परावर्तित होताना दिसते. व्यष्टी आणि समष्टी जीवनाचा अर्थ वारीतून कळतो. त्याच्या धन्यतेची पायाभरणीही वारीतच होते. संप्रदायाच्या दृष्टीनं वारी हे पारमार्थिक साधन आहे. ते एक शारीरिक तप आहे.त्यातून शरीर थकत असल, तरी मनाची उमेद निश्चित वाढते. अडचणींवर मात करण्याची ताकद वारी देते.
अहंकाराला राम राम करू न अतूट श्रद्धा वाढवणारं वारीइतकं चांगलं साधन नाही. म्हणूनच वारी हे पारमार्थिक मानवी जीवनाचं व्यापक दर्शन होय. त्यातून अंतरंगाची शुद्धी साधली जाते. गेली अनेक शतके संत गात जागा, गात जागा, प्रेम मागा, विठ्ठला’ हा संदेश देत आले आहेत. वारीचा सोहळा महाराष्ट्राचे एक ललामभूत वैशिष्ट्य आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या काळात ख-या अर्थानं महत्त्व प्राप्त झालेल्या वारीला संत नामदेव महाराज, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज आदी संतांनी जनाधार मिळवून दिला. आपल्या अभंगवाणीनं समस्त मानव जातीचा कल्याणाची गणितं प्रकट मांडणारे तुकाराम महाराज यानी वारी अत्युच्च शिखरावर नेली.
तुकाराम महाराज सांगतात : पंढरीची वारी, आहे माझ्या घरी, आणिक न करी तीर्थव्रत’ केवळ वर्षातले काही दिवस वारी समवेत पालखी बरोबर चालत जाण्यानं काय होतं, या प्रश्नाचं उत्तर भागवत संप्रदायात अगदी सहजपणे दिलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात : ‘येथे जातिकुळ अप्रमाण’ किवा हे आघवेची अकारण.’ या संतवचनामुळे समाजाला जगण्याचा नवा मंत्र दिला. वारकरी संप्रदाय महाराष्ट्रातील राजकीय पुनरुत्थानाला आधार दिला. त्याच संप्रदायातून निर्माण झालेल्या भागवत धर्मानं समाजातील एकीच्या प्रयत्नांना बळ दिलं.
संत तुकाराम महाराज सांगतात : एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ।। जे भक्ती निलोभ असली, तरी त्यामागं जगण्याचं एक विशाल तत्त्वज्ञान सामावलेलं असतं, याचं भान या संतपरंपरेनं सामान्य जीवाला दिलं. त्या आधीच्या सांप्रदायिक परंपरा सर्वसमावेशक होऊ शकल्या नाहीत आणि वारकरी संप्रदायानं मात्र ते करून दाखवल. कारण समाजातल्या शेवटच्या माणसाबद्दल कमालीचा कळवळा होता. संत सांगतात. स्वरूपाचिया प्रसरा। लागी प्राणेंदियशरीरा।। आटणीकरणे जे वीरा ।आता तेचि तप। वारी मध्ये शरीर, इंद्रिय, प्राण झिजले जातात. यामध्ये अनेक साधनांचा समावेश होतो.
ज्ञानासाठी आवश्यक | विवेक-वैराग्य दिक आंतरिक शुद्धीची साधने; तसेच समाधीसाठीची यमनियमादिक साधन वारीत आपोआप साधली जातात. भक्ती साठी आवश्यक वृद्धसेवेपासूनची साधनं; तसंच परमार्थासाठी आवश्यक साधने वारीत सहभागी झाल्यानं प्राप्त होतात. असं सर्व साधनांचं सार म्हणजे वारी आहे. तरीही तिचं इतर साधनांपेक्षा वैलक्षण्य शिल्लक राहतील. हे एकमेव साधन असं आहे, की साध्य प्राप्तीपूर्वीच यातून आनंदाची अनुभूती येऊ लागते आणि म्हणून साध्यप्राप्तीत या साधनेच्या सातत्याची मागणी करण्याचा मोह अनावर होतो. म्हणूनच तुकाराम महाराजही म्हणतात. हेचि व्हावी माझी आस। जन्मोजन्मी तुझा दास। पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी ।। म्हणूनच वारीचं महत्व मोठं आहे. प्रेम चालिला प्रवाहो । नामओघ लवलाहो । हे वारीचे स्वरूप आहे, तर आनंदाचे डोही आनंद तरंग। आनंदचि अंग आनंदाचे। हेच वारीचं फळ आहे.
———-रामकृष्णहरी———
हे ही वाचा —–
- इतिहास भारतीय स्वातंत्र्य दिनाचा | What is Indian Independence Day Information
- छत्रपती राजर्षी शाहू महाराज संपूर्ण माहिती | Biography Chhatrapati Rajrashi Shahu Maharaj Information In Marathi
- शिवराज्याभिषेकाचा इतिहास काय आहे? |What is the history of ShivRajyabhishek?
- छावा संभाजीराजेंच बलिदान स्थळ भीमा-भामा-इंद्रायणी तिरी तुळापूर आणि वढू
- महाराणी येसूबाई यांच्या समाधीचा शोध लागला; जुन्या जमीन दान पत्रामुळे उलगडा झाला